पणजी : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या भोम - खोर्ली येथील रस्ता रुंदीकरणाबाबत काल सोमवारी मंत्रालयात स्थानिक नागरिक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तांत्रिक समितीची बैठक झाली. यात ६० मीटर ऐवजी आता २५ मीटरचा दोन किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव खात्याच्या वतीने नागरिकांना दाखविण्यात आला असून, यामुळे या परिसरातील कोणत्याच मंदिराला बाधा येणार नसून केवळ चार घरे हटवली जातील. या चारही घरांना योग्य पुनर्वसन केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज मंगळवारी भोम गावात प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली अर्थात या मोजणीला गावकऱ्यांचा विरोध असून ते अजूनही बायपास रस्त्यावर ठाम आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ७४८ च्या प्रस्तावित पणजी- बेळगाव या चौपदरी रस्त्याच्या रस्त्याचे भोम गावालगतचे रस्ता रुंदीकरण आणि भूमी अधिग्रहणाचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे रखडले आहे. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या परिसरातील ७ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १ हजार ६०.२१ कोटी रुपये मंजूर करत भूमी अधिग्रहणचे काम तातडीने करून द्या असे राज्य सरकारला निर्देशित केले आहे. यामुळे सक्रिय झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने या कामाला प्राधान्यक्रम दिला आहे. या रस्त्यात श्री. देव ईश्वर- महादेव, श्री. देवी सातेरी नारायणी मंदिरासह सती देवीची घुमटी, राखणदाराची तुळस यासह अनेक घरे, दुकाने, हॉटेल्स येतात. त्यामुळे सरकारने आता या परिसरात २ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्तावित तयार केला आहे.
स्थानिक नागरिकांना काल दाखविण्यात आला. यामुळे या परिसरातील कोणत्याच मंदिराला हटवण्याची गरज नसून ती सर्व मंदिरे सुरक्षित राहतील आणि केवळ चार घरे हटवली जातील. या चारही घरांच्या मालकांना स्वतंत्र ठिकाणी जागा देऊन घरांचे पुनर्वसन केले जाईल अशी माहिती दिली होती.
या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज मंगळवारी भोम गावात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची मोजणी केली. मात्र या मोजणीला अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी आक्षेप नोंदवत विरोध केला. तरीही ही नोंदणी पूर्ण झाल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी गावकऱ्यांनी या उड्डाणपुलाला तीव्र विरोध केला असून, ते बायपास रस्त्यावर ठाम आहेत. अजूनही नागरिकांची घरे आणि मंदिरे हटवली जाण्याची भीती कायम आहे.